शनिवार, ३० जुलै, २०१६

' इव्हेँट ' आणि वास्तव !

आजऱ्याच्या बसस्थानकावरचे झाड तोडले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना प्रायश्चित म्हणून आपण २५ झाडे लावून घेतली होती . रोज किंवा २ - ४ दिवसांतून जाऊन बघायचो काय झालंय झाडांचं . आज त्यातली १९ झाडे जिवंत आहेत आणि बरीच वाढली आहेत . त्यातलं एक वडाचं झाड आहे इथे . गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही .
         १ जुलैचा वृक्ष लागवडीचा ' इव्हेंट ' ह्या डोळ्यांनी मी पहिला आहे . चव्हाणवाडीवर मी , राजू देसाई , आणि बाबू कांबळे असे तिघेजण गेलो होतो . तेथे गेल्यावर असे दिसले की इव्हेंटची तयारी करण्यात वनकर्मचाऱ्यांनी कोणतीच कसूर ठेवली नव्हती . पण मी मात्र समाधानी नव्हतो . हरेक राजकीय पार्टीचा नेता तिथे येत होता आणि झाड लावत असलेला फोटो काढून घेऊन मार्गस्थ होत होता . शाळेच्या मुलांना मास्तरांनी सोबत आणले होते . मुलांसाठी ही जणू ट्रिपचा आनंद देणारी गोष्ट होती . झाडांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या शिक्षकांच्या काय भावना होत्या ते मला माहीत नाही ; पण झाडे लावून आपण पर्यावरणावर उपकार करत असल्याचा अविर्भाव मला दिसला . त्या मुलांनी इतस्त: फेकलेल्या प्लॅस्टिकच्या ग्लासांकडे पाहून अजून मला वाईट वाटत होते . ते ग्लास उचलून मी बाजूच्या खोक्यात टाकले .
वनकर्मचाऱ्यांनी आणलेल्या झाडांची उंची खूपच कमी होती असे मला जाणवले . यावर श्री . डेळेकर साहेब आणि श्री . कातळे साहेब यांनी सांगितले की , ' काही होत नाही सर सर्व झाडे जगतील ! ' मला त्यांच्या या आशावादाचे खूपच कौतुक वाटले . वनविभागातले हे असे काही कर्मचारी आहेत की जे झाडांवर ड्युटी म्हणून नाही  तर मनापासून प्रेम करतात ! तरीही झाडे कमी उंचीची असणे , त्यांच्या जवळ काठी न खोवणे , त्या झाडांच्या सुरक्षेसाठी भोवती कुंपण न करणे , झाडांच्या रोपांची प्लॅस्टिकची पिशवी गोळा न करणे , खड्डयांची खोली समाधानकारक नसणे या मुद्द्यांमुळे मला हा नुसताच फार्स वाटला .
परंतु एक बाजू अशीही आहे की , डेळेकर साहेब आणि कातले साहेब दोघांनीही ही झाडे ८ दिवसांनी येऊन बघा असा आत्मविश्वास दाखवला आहे . मला ह्या माणसांवर विश्वास आहे .
2) आजरा कॉलेजात शिकणाऱ्या दादू गाईंगडे व त्याच्या मित्रांनी पेरणोलीच्या डोंगरात  झाडे लावली . वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मी ' इव्हेंट ' च्या  दिवशी ( 1 जुलैला ) म्हटले होते की आपल्याला अजून किमान 500 - 1000 झाडे लावायची आहेत . त्यांनी मग पेरणोलीच्या डोंगरात झाडे लावण्याचे नियोजन केले. आणि ह्या सगळ्या मित्रमांदियाळीसोबत जाऊन जवळपास 700 रोपे लावली . कॉलेजातून सरळ डोंगरात येणाऱ्या मुलांच्या चपाती भाजीची सोय वनविभागाच्या वतीने करण्यात आली होती . मुलांच्या ऊत्साहाने कमाल केली . किरकोळ भाग सोडला तर संपूर्ण पठारावर औषधी आणि इतर रोपांची लागवड केली .
             शिवजयंतीच्या उत्सवात तलवारी नाचवत नाचणाऱ्या आणि गडावरून ज्योती / मशाली आणून महाराजांचे पांग फेडल्याच्या भ्रामक समजुतीत आसणाऱ्या अनेक तरुणांना महाराजांच्या स्वप्नाला साकार करायला म्हणजे वृक्ष लागवडीला येता काय म्हणून विचारले ; तर त्यांनी विविध कारणे सांगून बाजू मारली . मला वाईट वाटले क्षणभर . पण ह्या NR बॉईजनी मात्र मला उत्साहित केले .न थकता प्रचंड ऊत्साहाने वृक्षारोपण पार पडले . प्लास्टिकच्या पिशव्याही गोळा केल्या . यात वनकर्मचाऱ्यांचा उत्साह फारसा जाणवला नाही . त्यांच्यासाठी हे दरवर्षीचं काम आहे . दरवर्षी झाडे लावायची , दरवर्षी आगीत किंवा पाण्याच्या अभावाने ती मरतात , मग पुढच्या पावसाळ्यात त्याच जाग्यावर दुसरी झाडे लावायची ....आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या ...!
        बबलू शेखने बोललेलं वाक्य मला आठवलं , ' फॉरेस्ट विभागात  झाडावर जीव आसणारी माणसं का भरती करत नाहीत ? माझ्याबरोबर खुपता तो जंगल किंवा झाडाला लागलेली आग विझवायला आला होता . विभागातल्या फॉरेस्टरनी सगळी सोय उत्तम केली पण ; खड्डा खणणे , झाडे लावणे असे केल्याचं मला दिसलं नाही . वयामुळं त्यांना थकवा आलेला जाणवला ... तरीही त्यांनी आलेल्या मुलांचे खूप कौतुक केले . असो !
     ....  तर अशी आहे यावर्षीची वृक्षारोपणाची ' स्टोरी ' ...... साता उत्तरा सुफळ ( कळेलच नंतर ..! ) संपन्न !
:-D  या युवकांनी 14 जुलैच्या वृक्षारोपणाची धुरा सांभाळली ! :-

Shridhar Gaingade
Vaibhav Bolke
Vaibhav Salokhe
Rony Fernandes
Akshay Shivane
Omkar Sutar
Ketan Palkar
Peter Fernandes
Suraj Katkar
Ajit Mulik
Akshay Gelekar
Vishal Kamble
Sohel Nesarikar
Sushant Nirmale
Rohit Desai

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा